Devendra Fadnavis : मुंबईच्या धर्तीवर नागनदीतील प्रदूषणावर प्रतिबंध घालण्यासाठी शहरात दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. नागपूर महानगराच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने, पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लवकर पूर्ण झाला पाहिजे. यासाठी व्हीएनआयटी व डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (एसटीपी) जागेबाबत मुंबईच्या धर्तीवर व्हर्टिकल पद्धतीने विचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर महानगरातील विविध विकास कामांचा आढावा बैठक घेण्यात आली.
दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार…
शहरातील पाण्याच्या टाक्यांमध्ये प्रेशर नसल्याने पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. यासाठी पाणी पुरवठा करणा-या संस्थेने करारात निर्देशित केल्याप्रमाणे पाणीपुरवठ्याच्या टाक्या या वेळेत भरणे आवश्यक आहे. याबाबत कल्पना देऊनही जर ती संस्था ऐकत नसेल तर त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. एक दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील व्हीएनआयटीच्या जागेत तसेच सीताबर्डी भागातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेत दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचे ठरविण्यात आले आहे. या जागेबाबत दोन्ही संस्थांचे म्हणणे लक्षात घेऊन तत्काळ टीसीएसमार्फत सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

पाणी पुरवठा सुरळीत करा
दुसरीकडे शहरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ही कामे करण्यासाठी सहा पथके लावण्यात आली असून येत्या दोन महिन्यात सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होतील, असे महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले. शहरातील एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाअंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरा प्रणालीचा आढावा यावेळी घेण्यात आला. नागपूर शहराच्या विकासासाठी नवा डीपीआर तयार करण्याच्या मुद्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. हा डीपीआर तयार करताना पोलीस विभागाला सुद्धा सहभागी करून घ्यावे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.