राज्यातील पावसाबाबत आता मोठी अपडेट समोर येत आहे. त्यानूसार, मुंबईसह कोकण परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाची संततधार सुरू आहे. आज, 15 जून रोजी संपूर्ण कोकण विभागात आणि मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सून कोकण किनारपट्टीवर सक्रिय झाल्यामुळे वातावरणात लक्षणीय बदल जाणवत असून, पुढील 24 तासांत काही भागांत गडगडाटासह पावसाचा जोर वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाचा पुढील चोवीस तासांसाठी पावसाचा अंदाज नेमका काय ते सविस्तर जाणून घेऊ…
कोकण आणि मुंबईला इशारा
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रविवारी पहाटेपासून आकाश ढगाळ राहील. सकाळी हलक्या सरी पडतील, तर दुपारी व संध्याकाळनंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून, लोअर परळ, हिंदमाता, सायन, दादर या सखल भागांत पाणी साचू शकते. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, वसई-विरार, तलासरी, बोईसर या भागांतही सकाळपासून मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी सुरू राहतील. तापमान सुमारे 28 ते 29 अंश सेल्सियसच्या दरम्यान राहील. दुपारनंतर विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी शेतात काम करताना योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
रायगड-ठाण्यात पावसाचा अंदाज
नवी मुंबई आणि ठाणे परिसरातही आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पहाटेपासूनच आकाश ढगाळ राहील, सकाळी हलक्या सरी पडतील आणि दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तापमान 27 ते 30 अंश सेल्सियसच्या दरम्यान राहील. सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
संपूर्ण कोकण विभागात आज दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सकाळपासून ढगाळ हवामान राहील, काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, पण दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि समुद्रकिनाऱ्यांवर वेगवान वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान अंदाजे 29 अंश, तर किमान तापमान 26 अंश सेल्सियसच्या आसपास राहील. दमट हवामानामुळे उकाड्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडू शकतात.