राज्यातील काही जिल्ह्यांना पुढील 4 दिवस पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज काय?

राज्यातील काही जिल्ह्यांना आज हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनबाबत देखील अपडेट समोर आली आहे. सविस्तर जाणून घेऊ...

राज्यात मान्सूनची गती सध्या मंदावल्याचं चित्र आहे. असं असताना राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे; उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी कडक उन्हाची परिस्थिती असणार आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता. नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील वातावरणाबाबत एकूणचं काय अंदाज वर्तवला आहे, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

राज्यात हवामानाची संमिश्र स्थिती

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसासोबतच वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. 3 ते 6 जूनदरम्यान हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस, मेघगर्जना आणि 30 ते 50 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे राज्यातील काही भागांवर तडाखा देण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या सतत हवामानात बदल होत आहे. आज महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा इशारा जारी केला आहे. उर्वरित भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा कडक उन्हाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाऊस ओसरल्यानंतर प्रचंड उकाडा आणि सतत येणाऱ्या घामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या मान्सूनला थोडा ब्रेक लागल्याने नागरिक पुन्हा पाऊस कधी बरसेल याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मराठवाडा, विदर्भात कसे असेल हवामान?

मराठवाड्यातही हवामान अस्थिर राहणार असून, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आज हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे. 4 जून रोजी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडेल. 5 जून रोजी 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि पाऊस पडेल, तर 6 जून रोजी वाऱ्याचा वेग थोडा कमी होऊन 30 ते 40 किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा आणि वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये सलग 5 दिवस वादळी वाऱ्यांसह (30 ते 50 किमी प्रतितास वेगाने) आणि विजांच्या कडकडाटासह हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.या भागांतील नागरिकांना हवामान विभागाने विशेष सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. वीज पडत असताना किंवा वादळी वाऱ्यांच्या वेळी शक्यतो घराबाहेर न पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात मध्यम पाऊस

उत्तर महाराष्ट्रात पावसासह वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये आज तुरळक पावसाचा अंदाज आहे. 4 जूनला विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 5 जून रोजी वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास राहण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही या हवामान बदलाचा परिणाम होणार आहे. आज काही ठिकाणी हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, 4 जून रोजी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. 5 आणि 6 जून रोजी वाऱ्याचा वेग 30 ते 50 किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकण, मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस?

रायगड जिल्ह्यात 5  आणि 6 जून रोजी पुन्हा एकदा मध्यम पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, 4 ते 6 जूनदरम्यान पावसाचा जोर कमी होईल आणि पुन्हा एकदा ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळेल. पालघर जिल्ह्यात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 4 आणि 5 जून रोजी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी पडतील, तर 6 जून रोजी पुन्हा एकदा हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई आणि ठाणे शहर आणि जिल्ह्यात 5 आणि 6 जूनला मुसळधार पावसाचा अंदाज आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News