भीमाशंकरमध्ये 288 कोटींच्या विकास आराखड्याला मंजूरी; भाविकांसाठी अनेक सुविधा निर्माण करणार

नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी भीमाशंकर येथे भाविकांसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या 288.71 कोटींच्या आराखड्याला सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.

भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून ते पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. हे शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. येथे भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला, असे मानले जाते. त्यामुळे हे स्थान आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी भीमाशंकर येथे भाविकांसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या 288.71 कोटींच्या आराखड्याला सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये हेलिपॅडची देखील निर्मिती केली जाणार आहे.

भीमाशंकरचा कायापालट होणार

भीमाशंकर परिसरात लवकरच हेलिपॅडची सुविधा निर्माण केली जाणार आहे. तसेच वाहनतळावर सुमारे 2000 चारचाकी, 200 मिनी बस आणि 5 हजार दुचाकी उभ्या राहू शकतील इतके मोठे पार्किंग विकसित होणार आहे. भाविकांना सुविधा देण्यासाठी प्रतीक्षा कक्ष, स्वच्छतागृहे, स्नानगृहे, लॉकर, दुकाने आदी सुविधा पुरवण्यात येणार आहेत.

भीमाशंकर बसस्थानकाचे पुनर्विकास काम आणि मंदिर परिसरातील सुधारणा यामध्ये समाविष्ट आहेत. राम मंदिर आणि दत्त मंदिराची पुनर्बांधणी करण्यात येणार असून दिव्यांगांसाठी विशेष इलेक्ट्रिक वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे. राजगुरूनगरमार्गे नवीन मार्गाची उभारणी, श्री कोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार, ट्रेकिंग मार्गांची निर्मिती आणि पायी चालण्यास योग्य पायवाटा या विविध कामांचा या आराखड्यात समावेश आहे.

भीमाशंकरचे आध्यात्मिक महत्व

भीमाशंकर हे भगवान शिवाचे एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि भक्तांसाठी अत्यंत पूजनीय स्थळ मानले जाते. इथे येणारे भक्त शिवाची कृपा मिळवण्यासाठी उपवास, अभिषेक, रुद्रपाठ आणि विशेष पूजा करतात. महाशिवरात्रीला येथे लाखो भक्तांची गर्दी होते. असे मानले जाते की इथे शिवाचे दर्शन घेतल्याने पापांचे क्षालन होते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो. सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेल्या या स्थानी भक्तांना शांतता, समाधानी अनुभूती आणि अध्यात्मिक ऊर्जा मिळते. अनेक भक्त येथे दरवर्षी नित्यनेमाने येऊन आपल्या श्रद्धेची पुर्तता करतात. भीमाशंकर हे भक्तांसाठी श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News