वर्धा: राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणावर राज्यात सातत्याने वेगवेगळी विधान आणि घोषणा केल्या जात आहेत. काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कर्ज देऊ, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वर्ध्यात मोठं विधान केलं आहे. फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं आहे. आगामी काळात लाडक्या बहिणींना आर्थिक सक्षम बनवायचं आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
‘1 कोटी महिलांना लखपती करणार…’
सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना केवळ पंधराशे रुपये देऊन शांत बसायचं नाही. तर त्यांना लखपती दीदी बनवायचं आहे. त्यांचं सक्षमीकरण करायचं आहे. आमचं लक्ष्य आहे की, राज्यातील 1 कोटी बहिणींना लखपती बनवणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा सुरु आहे”. आता आगामी काळात याबाबत पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. ही योजना केंद्र सरकारची लखपती दीदी योजना असण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारची लाडकी बहीण योजना नेहमी चर्चेत असते. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. आगामी काळात या योजनेच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एका योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे. आगामी काळात लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.