Indrayani River Bridges : रविवारी पुण्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव-दाभाडे शहराजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जूना पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे ३० ते ३५ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतानाच जखमींवर तातडीने उपचाराचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश…
दरम्यान, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. आणि राज्यातील अशा जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. कुंडमळामध्ये ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत बचावकार्याला वेग देण्याचे, एनडीआरएफच्या तुकड्या, अग्नीशमन दल, रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.

शासनाकडून ५ लाखांची मदत…
दुसरीकडे या कोसळलेल्या पूलासाठी ८ कोटीची निधी मंजूर केला असताना, याचे काम केले नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर यात अद्यापर्यंत चार जणांचे मृत्यदेह सापडले आहेत. मृत्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतानाच पर्यटनस्थळी विशेषता सुटीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आपातकालिन मदतीसाठीची यंत्रणा तत्पर ठेवावी अशा सुचनाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.