कर्जमाफीच्या मुद्द्यावर मोठी हालचाल, बच्चू कडूंनी थेट कृषिमंत्र्यांच्या घरासमोरच…

कर्जमाफीच्या मागणीवरून राज्यभरात बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक झालीयं. सत्ताधारी नेत्यांच्या घरासमोर मशाल मोर्चा काढण्यात येत आहे.

मुंबई:  विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दिव्यांगांना मानधन वाढीचं आश्वासन महायुतीकडून देण्यात आलं होतं. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर कुठलीही चर्चा करण्यात आली नाही किंवा दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यात आलं नाही. त्यामुळं आता प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं राज्यभरात  बच्चू कडूंच्या नेतृत्वात आंदोलन केले जात आहे.

कृषिमंत्र्यांच्या घरासमोर मशाल मोर्चा

कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या घरासमोर काढलेल्या मशाल मोर्चात स्वत: बच्चू कडू उपस्थित झाले होते. यामुळे आंदोलनाची धग थेट कृषिमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू म्हणाले की, सत्ताधारी आमदारांच्या समोर महाराष्ट्रभर शेतकरी आणि कार्यकर्ता मिळून हे आंदोलन करत आहोत. शेतकऱ्याच्या घरातला दिवा गेला, वात गेली. दिवसा शेतकरी या सरकारला दिसत नाही म्हणून रात्री शेतकरी टेंबा घेऊन आम्हाला आंदोलनं करावी लागत आहेत.लमाणिकराव कोकाटेंना आम्हाला समजावून सांगायचे आहे, तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहेत. हे त्यांचे काम आहे. त्यांनी कसा हा शेतकऱ्यांचा प्रश्न सरकारमध्ये आणता येईल हे काम त्यांनी केलं पाहिजे. असे बच्चू कडू म्हणाले.

तिकडे भंडाऱ्यात सत्ताधारी शिवसेना पक्षाचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्या घरासमोर मशाल आंदोलन करण्यात आलं. यावेळी उपस्थित प्रहार संघटनेचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांना तातडीने कर्जमुक्त करण्याची मागणी केली.  साताऱ्यातील शिवतीर्थावर मध्यरात्री प्रहार संघटनेच्या वतीने मशाल आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं.

आश्वासन विसरले, पुढे काय?

विधानसभा निवडणुकीपुर्वी सर्व पक्षीय आमदारांनी आपापल्या पक्षाच्या जाहिरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र सध्यातरी या आश्वासनाची पूर्तता होईल असे चित्र दिसत नाहीयं. दरम्यान, अर्थमंत्री अजित पवारांनी किमान दोन वर्षे तरी शेतकरी कर्जमाफी मिळणार नसल्याचे संकेत या आधीच दिले आहेत, त्यामुळे याबाबत पुढे राज्य सरकार काही पाऊल उचलते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News