आज संध्याकाळी 7.30 वाजता अहमदाबादमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये अंतिम सामना खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यावर काही प्रमाणात पावसाचं सावट असल्याचं बोललं जात आहे. अंतिम सामन्यात पावसाची शक्यता खूपच कमी आहे. या दिवशी अहमदाबादमध्ये हवामान उष्ण राहू शकते. हवामान विभागाच्या अहवालानुसार, पावसाची शक्यता फक्त 20 टक्के आहे. 3 जून रोजी हवामान स्वच्छ राहू शकते आणि अंतिम सामना देखील कोणत्याही व्यत्ययाशिवाय होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु, जर पावसाने व्यत्यय आणलाच तर चित्र काय असेल, ते समजून घेऊ…
पाऊस झाल्यास विजेता कोण ?
जर आज ( 3 जून 2025) आयपीएलच्या अंतिम सामन्यात पाऊस पडला तर हा सामना दोन तासांनी वाढवता येऊ शकतो. जर पावसामुळे आज सामना झाला नाही तर तो उद्या, अर्थात 4 जूनला खेळवला जाईल, उद्याचा दिवस फायनलसाठी रिझर्व्ह ठेवण्यात आला आहे. मात्र उद्याही जर सामना झाला नाही, तर पंजाब किंग्जला आयपीएल 2025 चा विजेता घोषित केले जाऊ शकते, कारण लीग सामन्यांमध्ये पंजाबचा संघ हा आयपीएल पॉइंट्स टेबलमध्ये आरसीबीपेक्षा पुढा होता. दोन्ही पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहेत. पॉइंट टेबलमध्ये दोन्ही संघांचे 19-19 गुण आहेत, परंतु पंजाबचा नेट रन रेट बंगळुरूपेक्षा चांगला आहे, त्यामुळे रजत पाटीदारचा बंगळुरू संघ दुसऱ्या स्थानावर आहे आणि श्रेयस अय्यरचा पंजाब पहिल्या स्थानावर आहे. याआदी काही वेळा आयपीएल किताब विभागून देखील देण्यात आले आहेत, याचाही विचार होऊ शकतो.

क्वालिफायर 2 सामना पावसामुळे लांबला…
1 जून रोजी अहमदाबादमधील याच मैदानावर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात क्वॉलीफायर-2 चा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सुमारे दोन तास सतत पाऊस पडत होता, त्यामुळे सामना संध्याकाळी 7:30 ऐवजी राच्री 9: 45 वाजता सुरू झाला. या सामन्यात 2 तासांचा अतिरिक्त वेळ राखीव ठेवण्यात आला होता, त्यामुळे एकही षटक कमी करण्यात आले नाही आणि सामना पूर्ण 20-20 षटकांचा खेळवण्यात आला. या सामन्याचा निकाल उशिरा, मध्यरात्री 2 च्या सुमारास लागला.
आरसीबीसाठी पाऊस धोक्याची घंटा
पाऊस सलग दोन दिवस म्हणजेच 03 आणि 04 जूनला झाला, तर हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी धोक्याची घंटा असेल. कारण अशा परिस्थितीत सामना जर झालाच नाही अथवा अनिर्णित राहिला तर पंजाब किंग्सला आयपीएलचा विजेता घोषित केलं जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आज अहमदाबादमध्ये पाऊस पडू नये, सामन्यात व्यत्यय येऊच नये अशी प्रार्थना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे फॅन्स करताना दिसत आहेत.