मुंबई – समतेचा संदेश देणारे बाबासाहेब यांच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत न्याय मिळाला पाहिजे, यासाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिले. त्या संविधानामुळे आज देशातील लोकशाही टिकून आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती आहे. त्याबद्दल मी त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो… वंदन करतो. समाजातील तळागळातील, वंचित लोकांना बाबासाहेबांनी मुख्य प्रवाहात आणले. त्यांना समत, बंधुता आणि समानतेचा हक्क, अधिकार दिला. बाबासाहेब हे महान व्यक्ती क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य ज्ञानी होते. त्यांच्या गौरवापित्यर्थ परदेशातील विद्यापीठातील बाबासाहेबांचे पुतळे उभे केले आहेत. पण काहीजण उगाच हातात लाल डायरी घेऊन संविधान धोक्यात आहे म्हणतायेत, असा टोला राहुल गांधींचे नाव न घेता लगावला. एकनाथ शिंदेंनी आज माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
काँग्रेसने बाबासाहेबांना त्रास दिला…
दरम्यान, पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, बाबासाहेबांची आठवणी जतन करण्याचं काम करतोय. म्हणून हिंदू मिलमध्ये देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचं बाबासाहेबांचे स्मारक उभा राहत आहे. जगाला हेवा वाटावं असं ते स्मारक त्या ठिकाणी उभे राहतंय. हे देखील तमाम देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. काँग्रेसने बाबासाहेबांना त्रास दिला. बाबासाहेबांचा पराभवही केला. परंतु खऱ्या अर्थाने 2014 साली या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी झाले. आणि खऱ्या अर्थाने संविधान दिन साजरा होऊ लागला. तोपर्यंत संविधान.. सविधान… सविधान म्हणून फक्त लोकं गळा काढत होते. पण काही करत नव्हते. आपण देखील महाराष्ट्र सरकार तालुका तालुकास्तरावर आपण संविधान भवन उभा करत आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

बाबासाहेबांचे दर्शन महत्त्वाचे…
आमचे सरकार देखील बाबासाहेबांच्या विचारावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालतंय. आणि म्हणून बाबासाहेबांची घटना सर्वसामान्यांना न्याय देणारी घटना आहे. सामान्य कुटुंबातला व्यक्ती या देशाचे प्रधानमंत्री झाले. एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला. आणि एक आमची दलित आदिवासी भगिनी या देशाची राष्ट्रपती झाली. ही सगळी जादू, किमया बाबासाहेबांच्या घटनेची बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाची आहे. आज जयंतीनिमित्त लोकांमध्ये उत्साह जल्लोष आहे. बाबासाहेब खरं म्हणजे संविधानाचे शिल्पकार आहेतच. पण ते माणुसकीचे देखील शिल्पकार आहेत. माणुसकी काय असते. माणसाने कसं जगावं… कसं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, न्याय मिळवा हे ब्रीदवाक्य बाबासाहेबांचे होते. या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होत आहे. याचा आनंद प्रत्येकाला आहे. तुम्हाला भाषण करण्यास दिले नाही म्हणून तुम्ही नाराज आहात का, असं एकनाथ शिंदेंना विचारले असता, त्या भाषणापेक्षा बाबासाहेबांचा दर्शन मला महत्त्वाचे आहे, असं शिंदे म्हणाले.