राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील गुंता सुटला आहे. या प्रकरणात मेघालय पोलिसांनी त्यांची पत्नी सोनम रघुवंशीला अटक केली आहे. मेघालय पोलिसांनी सांगितले की, इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पत्नीनेच हत्येचा कट रचल्याचं उघड झालं आहे.
काय आहे प्रकरण?
राजा रघुवंशी हत्याकांड मेघालयातील शिलॉंग येथे घडले. राजा आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी इंदोर येथील नवविवाहित दांपत्य होते. ते २० मे २०२५ रोजी मेघालयातील चेरापुंजी येथे हनिमूनसाठी गेले होते. २३ मे २०२५ रोजी ते दोघेही बेपत्ता झाले. त्यांच्या स्कूटरचा शोध २४ मे रोजी शिलॉंग-चेरापुंजी रस्त्यावर एका कॅफेमध्ये लागला. २ जून २०२५ रोजी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) ड्रोनद्वारे राजाचा सडलेला मृतदेह सोहरा येथील वेई सॉडॉंग धबधब्याजवळील दरीत सापडला. मृतदेहाची ओळख त्याच्या भावाने त्याच्या उजव्या हातावरील टॅटूच्या आधारावर केली.

मेघालय पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून तपास सुरू केला. तपासात असे समोर आले की, सोनमने राजाच्या हत्येसाठी व्यावसायिक भाडोत्री हत्यारांना भाड्याने घेतले होते. सोनमने उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे आत्मसमर्पण केले, तर इतर तीन आरोपी पोलिसांनी अटक केली. कुटुंबीयांनी या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) कडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पत्नीनेच रचला होता हत्येचा कट
मेघालयचे डीजीपी आय नोंगरांग म्हणाले की, राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पत्नी सोनमने उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. रात्री उशिरा छाप्यात इतर तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली. ते म्हणाले की, एका व्यक्तीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली, तर इतर दोन आरोपींना एसआयटीने इंदूरमधून पकडले.