मुंबई: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती महाराष्ट्रात मोठ्या राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक वर्षांपासून एकमेकांपासून वेगळ्या वाटांवर असलेल्या या दोन नेत्यांनी पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिल्याने राज्यातील राजकारणात नवा रंग भरला आहे. मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि भाजप विरोध ही संभाव्य युतीची मुख्य कारणे मानली जात आहेत. या घडामोडींमुळे विरोधकांमध्ये खळबळ उडाली आहे. ही युती झाल्यास आगामी महापालिका निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत दोन्ही बाजूंचे अनेक नेते याबाबतीत अनुकुलता दर्शवत आहेत.
‘मराठी माणूस दबावात, युतीची गरज’
ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रमुख महिला नेत्या किशोरी पेडणेकरांनी याबाबतीत एक मोठंं आणि महत्वपूर्ण विधान केलं आहे. ‘ महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे, हे आपण सर्वजण पाहतोय…मराठी माणूस सध्यस्थितीला परप्रांतीयांच्या दबावात गेला आहे. अशा परिस्थितीत राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित यावेत, ही तमाम महाराष्ट्रातील जनतेची भावना आहे.’ असं भाष्य किशोरी पेडणेकरांनी केलं आहे.

राज – उद्धव युती होणार?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युती सध्या महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेचा प्रमुख विषय बनली आहे. एकेकाळी एकत्र लढणारे हे दोन नेते कालांतराने वेगवेगळ्या मार्गांनी गेले, पण आता पुन्हा एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकत्र येण्याची शक्यता अनेक राजकीय समीकरणांना नवा वळण देऊ शकते. विशेषतः मराठी अस्मिता, हिंदुत्ववादी भूमिका आणि भाजपविरोध या मुद्द्यांवर ही युती आधारित असू शकते.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही युती झाल्यास ती आगामी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. दोघांचाही जनतेवर प्रभाव असून, त्यांच्या एकत्र येण्याने मराठी मतदारांची मते एकत्र येण्याची शक्यता आहे. मात्र, दोघांमध्ये आधीच्या राजकीय मतभेदांमुळे युती कितपत टिकेल, यावरही चर्चा सुरू आहे.सामान्य जनतेमध्ये या संभाव्य युतीबाबत उत्सुकता असून, काही जण याला राजकीय गरज मानत आहेत, तर काहींना वाटते की ही युती एका विचारसरणीवर आधारित आहे. पुढील काही महिन्यांत हे चित्र स्पष्ट होईल. पण एवढं नक्की की, राज-उद्धव युतीमुळे महाराष्ट्रातील राजकारणात नवे वारे वाहू शकतात.