मुंबई : पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे पार्थिव आणि नातेवाईकांना पुन्हा राज्यात आणण्याची प्रक्रिया सरकारच्या वतीने सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः यासंदर्भात बारकाईने आढावा घेत असून मार्गदर्शन करत आहेत. श्रीनगर येथे या पर्यटकांचे पार्थिव आणि त्यांच्या नातेवाईकांना विमानात बसवून देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि त्यांची टीम काल रात्रीच श्रीनगरमध्ये पोहोचली आहे.
पार्थिव मुंबईत आणले जाणार…
दरम्यान, श्रीनगरमध्ये अडकलेल्या इतर पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी शिवसेनेची एक टीम अद्यापही श्रीनगरमध्ये तळ ठोकून आहे. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव संध्याकाळी 6 वाजता निघणाऱ्या विमानाने पुण्यात आणले जाईल. तर डोंबिवलीचे रहिवासी असलेल्या हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन येणारे विमान 1 वाजून 15 मिनिटांनी निघून मुंबईला पोहोचेल. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या बाकीच्या पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या घटनेतील संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर-मुंबई एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. तर मुंबईत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे समन्वयासाठी उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेच्या मदत पथक पर्यटकांच्या संपर्कात…
राज्यातील नागरपूर, पनवेल, पुणे, ठाणे आणि डोंबिवली येथून काश्मीर सहलीसाठी गेलेल्या 40 आणि 55 जणांच्या ग्रुपशी या मदत पथकाने संपर्क केला असून, त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच त्यांच्यासह तिथे अडकलेल्या राज्यातील इतर पर्यटकांच्या देखील ते संपर्कात असून, त्यांना देखील सुखरूप राज्यात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या मदत कार्यावर लक्ष ठेवून असून कोणत्याही परिस्थितीत राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे. मात्र सध्या श्रीनगर मधील परिस्थिती नाजूक असून पर्यटकांना परत आणण्यासाठी यंत्रणांशी संपर्क साधून समन्वय साधावा लागत आहे. ही सर्व प्रक्रिया पार पाडण्याचे शर्थीचे प्रयत्न शिवसेनेच्या मदत पथकाच्या वतीने करण्यात येत असून, लवकरच केंद्र शासनाच्या मदतीने या पर्यटकांना सुखरूपपणे राज्यात आणले जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.