देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये आला आहे. कर्नाटक, केरळनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. केरळमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर सात जाणांचा मृत्यू देखील झाला आहे, मात्र ज्यांचा मृत्यू झाला त्यांचा मृत्यू हा कोरोनामुळेच झाला की अन्य कशामुळे हे अद्याप समोर आलेलं नाहीये. या रुग्णाच्या मृत्यूचं कारण तपासलं जात आहे.
देशातील रूग्णसंख्या 1,045 वर
देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 1045 वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक रूग्ण हे केरळ राज्यातले आहेत. 430 रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील रूग्णांचा आकडा देखील चिंता वाढवणारा आहे. महाराष्ट्रात 210, दिल्लीत 104 आणि गुजरातमध्ये 83 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कर्नाटकातील 80 रुग्णांपैकी 73 रुग्ण एकट्या बेंगळुरू मधील असल्याने चिंता वाढली आहे. दुसरीकडे मागच्या काही दिवसात कोरोनाने 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील 5 रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.

राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्टवर
महाराष्ट्रात कोरोनाने हातपाय पसरले आहेत. सोमवारी राज्यात 7,830 सॅम्पल घेण्यात आले. त्यात 369 रुग्ण कोविड19 पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले. मुंबईत काल 69 नवीन रुग्णांची भर पडली. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 278 च्या जवळपास आहे. तर राज्यात सोमवारपर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा 4 वर पोहचला.
चिंतेचा विषय नाही -आयसीएमआर
सध्या चिंतेचा विषय नाही. कोविडच्या नवीन स्वरुपाविषयी माहिती घेण्यात आली आहे. पश्चिम आणि दक्षिणेतून त्यासाठी काही नमुने गोळा करण्यात आले होते. यामध्ये कोविडचे नवीन व्हेरिएंट दिसले. पण ते गंभीर नाही, अशी माहिती बहल यांनी दिली. हे सर्व ओमीक्रॉनचे उप संसर्ग असल्याचे दिसले. यामध्ये LF.7, XFG, JN.1 आणि NB. 1.8.1 यांचा समावेश आहे.