लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी १५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – एकनाथ शिंदे

गेल्या वर्षी टंचाई परिस्थिती आणखी गंभीर होती. गेल्या वर्षी ५८० गावे आणि २२८१ वाड्यांना टँकर्स सुरु होते. सध्या राज्यातील १७ जिल्ह्यात आणि ४४७ गावांत आणि १३२७ वाड्या-वस्त्यांवर पाण्याचे टँकर्स सुरु आहेत.

मुंबई : सध्या राज्यातील काही भागात पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. पावसाला अजन दोन ते तीन महिन्यांचा अवधी असताना राज्यात काही ठिकाणी पाणीबाणी परिस्थीती निर्माण झाली आहे. दरम्यान, उन्हाळा तीव्र आहे… कडाक्याचे ऊन आहे. ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. त्यामुळे पुढील दोन महिने पिण्याचे पाणी जपून वापरा, असे निर्देश देतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदा आणि मुख्याधिकारी यांना दिले. तसेच प्रत्यक्ष फिल्डवर भेटी देऊन पाण्याची सद्यस्थिती जाणून घेण्याच्या व टंचाई असलेल्या भागात तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. १५ जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल, असे नियोजन करावे असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

१७ जिल्ह्यात ४४७ गावांत पाण्याचे टँकर्स सुरु…

गेल्या वर्षी टंचाई परिस्थिती आणखी गंभीर होती. गेल्या वर्षी ५८० गावे आणि २२८१ वाड्यांना टँकर्स सुरु होते. सध्या राज्यातील १७ जिल्ह्यात आणि ४४७ गावांत आणि १३२७ वाड्या-वस्त्यांवर पाण्याचे टँकर्स सुरु आहेत. अशी माहिती बैठकीत देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत प्रशासनाने डोळ्यात तेल घालून पाणी टंचाईला तोंड देण्याच्या आणि नियोजनबद्ध पद्धतीने पावले टाकून काम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात किती टँकर्स सुरु आहेत आणि गेल्या वर्षी काय परिस्थिती होती, याचाही आढावा घेतला. तसेच आवश्यकतेप्रमाणे विहिरी अधिग्रहित कराव्यात असेही निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

प्रत्यक्ष फिल्डवर रहा…

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्या जिल्ह्यांनी कृती आराखडा सादर केला नाही त्यांनी दोन तीन दिवसांत सादर करावा असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. तात्पुरत्या नळयोजनाना तसेच  तलावांत चर खणण्याच्या कामाला गती द्यावी. राज्यात काही ठिकाणी पाण्याची टंचाई उद्भवली असून येणाऱ्या दोन महिन्यात प्रशासनाने दक्षता घ्यावी आणि बीडीओ, तहसीलदार, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी सातत्याने फिल्डवर संपर्क ठेऊन आपापल्या भागातल्या टंचाईचा सर्व्हे करावा व योग्य ती पावले तातडीने उचलावीत, असे निर्देश शिंदेंनी दिले. तसेच पाण्याचे प्रमाण कमी झाले की, स्त्रोत दुषित होऊ शकतात. हे पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही ते तपासण्याची गरज आहे असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत पिण्याचे पाणी वाहून नेणारे टँकर्स देखील चांगले आणि स्वच्छ असावेत.


About Author

Astha Sutar

Other Latest News