पंढरपूर- पंढरपूरचं विठ्ठल-रुखमाई मंदिर हे उभ्या महाराष्ट्राचं दैवत. दररोज हजारो भाविक विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात येतात. विठुरायाच्या दर्शनाला असलेल्या गर्दीमुळे आतापर्यंत पदस्पर्श रांगेत तासनतास भाविकांना उभं राहावं लागत होतं.कधी कधी तर रांगेत १० ते १२ तास थांबून विठुरायाचं पदस्पर्श दर्शन घेता येत असे.
मात्र आता पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीनं घेतलेल्या एका निर्णयामुळे फार मोठा बदल झालाय. तत्कालीन मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या काळात टोकन दर्शन सुरु करण्याबात निर्णय झाला होता त्याला आता मुहूर्त मिळालाय. आता टोकन घेऊन भाविकांना ठराविक वेळेत दर्शन घेता येणं शक्य होणार आहे.

काय आहे टोकन दर्शन पद्धत?
1. तिरुपती मंदिराच्या धर्तीवर विठ्ठल मंदिरातही टोकन पद्धतीनं दर्शन
२. दर्शनाची वेळ निश्चित ठरावीक वेळेत दर्शन हॉलच्या माध्यमातून भाविकांचा मंदिरात प्रवेश
२. बंगळुरूच्या टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसकडून सेवाभावी तत्त्वावर टोकन दर्शन प्रणाली विकसित
2. दररोज ठराविक सहा कालावधीत प्रत्येकी 200 भाविकांना मिळणार दर्शनाची संधी
२. दिवसभरात हजारो भाविकांना घेता येणार टोकन पद्धतीनं दर्शनाचा लाभ
३. टोकन पद्धतीने दर्शनाची वेळ सकाळी 7 ते 8, 9 ते 10, 11 ते 12
4. टोकन पद्धतीने दर्शनाची वेळ दुपारी 1 ते 2, 3 ते 4, 7 ते 8
रविवारपासून टोकन पद्धतीला सुरुवात
रविवारी टोकन प्रणालीची सुरुवात पंढरपूरच्या मंदिरात करण्यात आली. प्रवेशाच्या वेळी भाविकांचं फुलांच्या वर्षावानं स्वागत झालं.टोकन स्कॅनिंगनंतर त्यांना दुसऱ्या मजल्यावर नेण्यात आलं. जिथं चहा-पाण्याची, स्वच्छतागृहांची आणि बसण्याची उत्कृष्ट सोय करण्यात आली होती.पूर्वी जिथं पाच-सात तास वाट पाहावी लागायची, तिथं आता फक्त एका तासात विठ्ठल दर्शन मिळतंय. त्यामुळं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
सोमवारी 2400 जणांना टोकन
रविवारी 1200 जणांनी देण्यात आलेल्या टोकनची संख्या सोमवारपासून 2400 करण्यात येणार आहे. आषाढी वारीच्या काळात लाखो भाविक पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्या काळातच टोकन पद्धतीत वाढ करणार की आणखी काही पर्याय निवडणार याचा निर्णय येत्या 27 तारखेला होणार असल्याचं मंदिर समितीच्या वतीनं सांगण्यात आलंय. टोकन दर्शन सुरु झाल्यानं वारकरी आणि भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मंदिर समितीच्या या निर्णयाचं कौतुकही होतंय.