Mumbai – पावसापूर्वी पालिकेकडून मुंबईत जय्यत तयारी करण्यात येत आहे. तसेंच वाहतूक कोंडी होऊ नये किंवा पाणी तुंबू नये म्हणून पालिकेकडून विविध उपायोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मशीद बंदर येथे असलेला कर्नाक उड्डाणपूल आणि विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल या दोन्ही प्रकल्पांची कामे आटोक्यात आली असून, दोन्ही पूल वाहतुकीस लवकरच खुले केले जाणार आहेत.
मुंबईतील दळणवळणाला अधिक गती मिळणार…
दरम्यान, महानगरपालिकेच्या पूल विभागाने काही नवीन पुलांचे बांधकाम केले आहे तर आणखी काही पुलांच्या बांधणीची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यात कर्नाक रेल्वे उड्डाणपूल आणि विक्रोळी रेल्वे उड्डाणपुलाचा देखील समावेश आहे. मुंबई महानगरातील वाहतूक सुरळीत राहावी या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत महानगरात विविध रस्त्यांवर उड्डाणपूल, रेल्वे मार्गावर उड्डाणपूल, पादचारी पूल, आकाश मार्गिका आदींची उभारणी करण्यात आली आहे.

त्यामुळे कर्नाक पूल आणि विक्रोळी पूल या दोन्हीही पुलांची उभारणी, स्थापत्य कामे व अनुषंगिक कामांची कालमर्यादा निश्चित केली आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून कामांना अधिक वेग आला आहे. अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ वाचणार…
मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसरातील् पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. पुलाची लांबी रेल्वेच्या हद्दीत ७० मीटर तर पूर्व बाजूला (पी डि’मेलो मार्ग) १५५ मीटर, पश्चिम बाजूला (मोहम्मद अली मार्ग) २५५ मीटर इतकी आहे. पूर्व बाजूकडील ८० पैकी ४० मीटर लांबीच्या डेक स्लॅबचे काम पूर्ण झाले असून त्याचा क्युरिंग कालावधी सुरू आहे. उर्वरित ४० मीटर अंतरासाठी “अर्ली स्ट्रेन्थ काँक्रिट” चा वापर करण्यात आला आहे.
जेणेकरून दिनांक ५ जून २०२५ पर्यंत क्युरिंग कालावधी पूर्ण होईल. एकूणच पुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. दरम्यान, पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणारा उड्डाणपूल पूर्व-पश्चिम परिसरासाठी वरदान ठरणार आहे. या उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होणार आहे.