मुंबई- युतीचे संकेत देणार नाही तर थेट बातमीच देईन, राज ठाकरेंसोबत युतीबाबत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाष्यानंतर युतीची चर्चा पुन्हा रंगतेय. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या पहिल्या पानावर उद्धव आणि राज यांचा एकत्र फोटो छापण्यात आलाय. राज आणि उद्धव एकत्र येणार का, या चर्चांना यामुळं उधाण आलंय.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊतही युतीबाबत सातत्यानं भाष्य करताना दिसतायेत. महाराष्ट्राच्या मनात आहे तेच घडेल असं उद्धव ठाकरे म्हणालेत. उद्धव ठाकरेंनी हे संकेत दिल्यानंतरही राज ठाकरे आणि मनसे मात्र सावध भूमिकेत दिसतायेत. युतीबाबत चर्चा झाली नसल्याचं मनसेकडून सांगण्यात येतंय. चर्चा झाली उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकलं तर राज ठाकरे १०० पावलं पुढे टाकतील, अशाही प्रतिक्रिया येतायेत.

मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक
ठाकरे भावांच्या युतीची चर्चा सुरु असतानाच मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिवतीर्थावर पार पडली. या बैठकीनंतर बोलताना युतीबाबतचा निर्णय राज ठाकरे घेतील, असं बाळा नांदगावकर म्हणालेत. युतीबाबत आपल्याला किंवा मनसैनिकांना काय वाटतं यापेक्षा राज ठाकरेंना काय वाटतं हे महत्त्वाचं आहे, असंही नांदगावकर म्हणालेत. ठाकरे बंधूंचा प्रश्न आपल्या अखत्यारित नाही, वरिष्ठांत काय बोलणी सुरु आहे, याची कल्पना नसल्याचंही नांदगावकर म्हणालेत.
मुंबईच्या 227 प्रभागांमध्ये जमिनीवर अभ्यास करुन एक अहवाल तयार करण्यात आला असून तो अहवाल राज ठाकरेंना सुपूर्द करण्यात आल्याचं नांदगावकरांनी सांगितलंय. 13 जूनला पुढची बैठक होणार असल्याचं सांगत येत्या काळात अनेक संघटनात्मक बदलांचे संकेत त्यांनी दिलेत.
राज ठाकरे मतं देत नाहीत – शरद पवार
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरु असतानाच शरद पवारांनी याबाबत भाष्य केलंय. पुण्यात अनौपचारिक गप्पात त्यांनी राज ठाकरेंचा किती फायदा होईल याबाबत प्रश्नचिन्हच उपस्थित केलंय. राज यांच्या सभांना गर्दी होते मात्र त्याचं मतात रुपांतर होत नाही असं पवार म्हणालेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे मतदार असल्याचंही शरद पवार म्हणालेत. महापालिका निवडणुकांसाठी मविआची वाटचाल काय असेल याबाबत साशंकता असतानाच शरद पवारांनी केलेल्या या विधानामुळं अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत.
आघाडीत जितके सहकारी तितकं चांगलं- सुप्रिया सुळे
तर राज ठाकरे आगामी काळात मविआत आले तर त्याचा फआयदाच मविआला होईल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. लोकशाहीत कुणी कुणासोबत जावे याचा पूर्ण अधिकार सगळ्यांना आहे, जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील ती चांगली बाब आहे, असं सुळे म्हणाल्या आहेत.
महायुतीच जिंकेल- एकनाथ शिंदे
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. राजकीय अनुभवानुसार योग्य वेळी यावर प्रतिक्रिया देईन असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत, तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी महापालिका निवडणुकीत महायुतीच जिंकेल असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय