कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस बरसणार; मुंबई-पुण्यातही पावसाचा अंदाज…हवामान विभागाने दिली अपडेट

हवामान विभागाकडून आज महाराष्ट्रातील काही भागांसाठी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील उत्तर - पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने आज चार जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा दिला असून पुढील 12 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, 19 जूनपासून 22 जूनपर्यंत राज्यात मान्सून सक्रिय राहणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाचा अंदाज सविस्तरपणे समजून घेऊ…

विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाचा अंदाज आहे की 19 जूनपासून पुढील चार दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत वेगवेगळ्या स्वरूपाचा पाऊस पडेल. विशेषतः कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, काही जिल्ह्यांत वीजा आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होईल. काही भागांत वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. लातूरमध्ये 20 जून रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे, तर बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत 19 व 20 जून रोजी वाऱ्यांचा जोर जाणवू शकतो. अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये 19 ते 22 जूनदरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि ताशी 30–40 किमी वेगाने वादळी वाऱ्यांची शक्यता आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्राला इशारा

राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल जाणवत असून मागील 12 तासांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. तीन चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव आणि मान्सूनच्या सक्रियतेमुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नवी मुंबई, पालघर आणि रायगडमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाचा जोर कायम आहे.

पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये 19 जून रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईतही मुसळधार सरींची शक्यता आहे. 20 ते 22 जूनदरम्यान या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. सिंधुदुर्गमध्येही याच कालावधीत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुणे, सातारा, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये 19 जूनला काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुढील तीन दिवस या भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. नाशिक शहरात विजांच्या कडकडाटासह ताशी 40–50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा आहे.

पेरणीच्या कामांना गती मिळणार

पावसातील सातत्या पाहता आता राज्यभरात शेतीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. पावसामुळे शेतकरी वर्गात आता समाधानाचं वातावरण आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News