नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांचा विरोध झुगारून होणारच; 20,787 कोटींची तरतूद

शेतकऱ्यांचा मोठा विरोध झुगारत नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग होणारच हे आता स्पष्ट दिसत आहे. यासाठी जवळपास 20 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्राच्या शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य मंत्रिमंडळाने तब्बल 20,787 कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे राज्याच्या पूर्वेकडील वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून ते पश्चिमेकडील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या महाराष्ट्र-गोवा सीमेला जोडणाऱ्या या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला गती मिळाली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या खर्चाला मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.  राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा हा द्रूतगती मार्ग 802.592 किलोमीटर लांबीचा असणार आहे.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठे पाऊल

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना  जोडणार आहे.  पुढे तो कोकण द्रूतगती महामार्गास गोवा-महाराष्ट्र सीमेवर जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठे माहुर, तुळजापूर आणि कोल्हापूर तसेच अंबेजोगाई ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत.  तसेच संतांची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्यकवी अंबेजोगाईस्थित मुकूंदराज स्वामी, जोगाई देवी तसेच 12 ज्योर्तिलिंगापैकी 2 औंढानागनाथ आणि परळी वैजनाथ, महाराष्ट्राचे आराध्य पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, यासह कारंजा-लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही दत्त गुरूंची धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत.  या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे 18 तासांच्या प्रवासाचे अंतर 8 तासांवर येणार आहे.

शेतकऱ्यांचा विरोध झुगारून कामाला गती?

शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून 12 हजार कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.  या निधीतून सुमारे 7 हजार 500 हेक्टरचे भूसंपादन करण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणार आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील शक्तीपीठांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न असून, त्यातून पर्यटन, वाहतूक आणि ग्रामीण भागाचा विकास साधण्याचे उद्दिष्ट आहे.

शक्तिपीठ महामार्गाचे महाराष्ट्रासाठीचे महत्व

शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात विविध शक्तीपीठे जसे की तुळजाभवानी (तुळजापूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), रेणुका माता (महुर), सaptश्रृंगी (वणी) ही श्रद्धास्थाने आहेत. या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. शक्तीपीठ महामार्ग तयार झाल्यास या तीर्थक्षेत्रांना जोडणारी वाहतूक सुलभ होईल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि पर्यटनाला चालना मिळेल. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील. त्याचप्रमाणे रस्ते विकासामुळे गावांमध्ये सामाजिक व आर्थिक प्रगती घडेल. हा महामार्ग धार्मिक पर्यटनाबरोबरच सांस्कृतिक एकात्मतेचा प्रतीक ठरेल. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम शक्तीपीठ महामार्ग करेल. त्यामुळे तो राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल.


About Author

Rohit Shinde

Other Latest News