राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. कोकणासह विदर्भातही पावसाची धुमशान सुरू आहे. आज रायगड जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दुपारी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात याबाबतची अपडेट दिली आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून ठाणे जिल्ह्यात १८ ते १९ यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय रायगडला १८ ते १९ जून रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळताना पहायला मिळत आहे. सकाळ पासून पावसाचा जोर वाढला असून या वाढलेल्या पावसामुळे नदी ओढ्यांना पुर आल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. या पावसाचा परिणाम मात्र कोयणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे या पावसामुळे कराड चिपळून हा राज्य महामार्ग बंद झाला आहे.
रत्नागिरीत तुफान पाऊस…
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील माती पेढे गावात आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. परशुराम घाटात गॅबियनवॉलच्या आजूबाजूची माती वाहून गेली. पेढे हे गाव परशुराम घाटाच्या पायथ्याशी आहे. गावातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात माती जमा झाली आहे. मातीमुळे गावात चिखलाचं साम्राज्य आहे. यावर ठोस उपाय योजना करण्याची ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे.