महाराष्ट्रात गेल्या ५ दिवसांत पावसाचे २१ बळी; ४१ हजार हेक्टर शेतीचं मोठं नुकसान

गेल्या आठवड्याहून अधिक काळापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. वर्षभर राबवलेल्या शेत पावसाच्या जोरदार सरीने अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहे.

मुंबई- मान्सूननं यंदा महाराष्ट्रावर स्ट्राईक केलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मान्सूनपूर्व आणि अवकाळी पावसानं राज्यात हाहाकार माजलेला असतानाच, 12 दिवस आधी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मुंबईसह कोकणातला काही भाग, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उ. महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागाला पावसानं जोरदार तडाखा दिलाय.

मे महिन्यातच आलेल्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान केलंय. कापूस, कांदा, सोयाबिन, द्राक्ष, ज्वारी अशा पिकांचं या पावसानं जोरदार नुकसान केलंय. तर अनेक नद्यांना कधी नव्हे ते मेमध्ये पूर आल्याचं पाहायला मिळालंय. नद्यांमध्ये वाहून गेल्यानं, वीज पडून मृत्युमखी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. गेल्या पाच दिवसांत महाराष्ट्रातील 21 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

4 दिवसांत पावसाचे 21 बळी

कुठे पाण्यात बुडून, कुठे वीज कोसळून, तर भिंत पडून अनेकांनी जीव गमावलाय. पुण्यात वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू झाला. नांदेडमध्ये 3 जणांनी जीव गमावला.
भंडाऱ्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. जालन्यात 2 जण पाण्यात बुडून दगावले. मुंबई शहर आणि उपनगरात एकूण 2 जणांचा मृत्यू झाला तर चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, बीड, रायगडमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झालाय

शेतीचं मोठं नुकसान

अवकाळी पाऊस आणि लवकर बरसलेल्या मान्सूनमुळे राज्यातील 41 हजार हेक्टर शेतीचं जबरी नुकसान झाल्याची माहिती सरकारच्या वतीनं देण्यात आलीय. शेतकरी हवालदिल झाला असून, आता खरिपाच्या पेरण्या कशा करायच्या असा प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झालेला आहे.

हातातोंडाशी आलेला घास हिरावला!

राज्यभरात 40, 949 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय. अमरावतीत 12,565 हेक्टरवर नुकसान , बुलढाण्यात 6,699 हेक्टरवर नुकसान, जळगावात 4,538 हेक्टरवर नुकसान, नाशिकमध्ये 3,523 हेक्टरवर नुकसान, सोलापुरात 1, 682 हेक्टरवर नुकसान , अहिल्यानगरमध्ये 1,441 हेक्टरवर नुकसान, चंद्रपुरात 1,572 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र पेरणी तोंडावर असताना शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदतीची गरज निर्माण झालीय. सरकारनं तातडीनं काही रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी जोर धरु लागलेली आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News