बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; कोकण, विदर्भ, मराठवाड्याला मुसळधार पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे देशभरात तुफान पावसाची शक्यता निर्माण झाली आहे, महाराष्ट्रात कोकणात मान्सून तर विदर्भ आणि मराठवाड्यात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची शक्यता आहे.

यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा 12 दिवस आधीच राज्यात हजेरी लावली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील इतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू उत्तरेकडे सरकणार आहे. पुढील 48 तासांमध्ये त्याची दिशा अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र याचा परिणाम म्हणून केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. गोव्याला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण आणि मराठवाडा-विदर्भात पावसाचा अंदाज

कोकण-गोवा आणि विदर्भात 29 व 30 मे रोजी पावसाची शक्यता असून त्यानंतर या भागांतील पावसाचा जोर थोडा कमी होईल. पुढील 24 तासांत फारसा बदल होणार नाही, मात्र त्यानंतर तापमानात 2 ते 4 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.

अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता असून, सुमारे 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. वादळी वाऱ्यांमुळे पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही स्थिती पुढील तीन ते चार दिवस राहील आणि त्यानंतर पावसात थोडी विश्रांती येईल, असा अंदाज आहे.
मागील 48 तासांत कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि काही ग्रामीण भागांमध्ये पावसाने प्रचंड हाहाकार माजवला आहे. काही भागांतील गावांचा संपर्क तुटला आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. अधूनमधून हलक्या सरी पडत आहेत. नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली परिसरातही पावसाने फारसा जोर दाखवलेला नाही. आजही या भागांत हलक्याशा सरी पडण्याचा हवामान विभागाचा इशारा आहे.

मान्सूनची स्थिती कशी राहणार?

रशियावर जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून 5 जूनपर्यंत रखडण्याची शक्यता आहे. राज्याला 2 दिवस तूफान झोडपून काढणारा पाऊस आता विश्रांतीवर गेलेला आहे. रशियावर असलेल्या जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातला मान्सून आता 5 जूनपर्यंत रखडणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. गेले 2 दिवस राज्यातल्या अनेक भागांना पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. त्यामुळे पुरपरिस्थिती देखील निर्माण झाली आहे. 27 मे रोजी रशियावर जास्त दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे अफगाणिस्तानातून कोरडी हवा अरबी समुद्र मार्गे भारतात येणार असल्याचा अंदाज आहे. 16 वर्षात पहिल्यांदाच मान्सूनने 8 दिवस आधीच राज्यात दमदार आगमन केलं आहे. त्यातच आता रशियातल्या जास्त दाबाच्या पट्ट्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या मान्सूनवर होणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News