रत्नागिरी-सिंधुदुर्गाला पावसानं झोडपलं, नद्या धोक्याच्या पातळीवर; दरडी कोसळल्यानं वाहतूक ठप्प

रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं थैमान घातल्यानं परिस्थिती गंभीर बनलीय. खेड तालुक्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी ते परशुराम घाटदरम्यान अनेक ठिकाणी रस्ता खचलाय. त्यामुळं वाहतुकीत अडथळे निर्माण झालेत.

मुंबई- रत्नागिरी जिल्हा आणि तळकोकणात पावसानं अक्षरशः हाहाकार उडवून दिलाय. गेल्या सात ते आठ दिवसांपासून दडी मारलेल्या मान्सूननं रविवारपासून पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केल्याचं पाहायला मिळालंय. रत्नागिरीत खेड, लांजा, चिपळून, संगमेश्वर परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. नद्याही दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही गावांचा संपर्कही तुटल्याची माहिती आहे. लांजा तालुक्यातही अतिवृष्टी झाली असून, मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा डेपोजवळ रस्त्यावर पाणी आलंय. लांजा एसटी स्टँड परिसरातही पाणी साचलं आहे.

लांजा भागात दरड कोसळली

लांजा नजीकच्या वाकेड घाटात दरड कोसळल्यानं मुंबई-गोवा महामार्गावर मातीचा मलबा आला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. लांजामधील अंजणारी पुलावरील काजळी नदी दुथडी भरून वाहतेय.. तर साटवली विभागात २२५ मि.मी. विक्रमी पाऊस झाला. संगमेश्वर तालुक्यात धामणी आणि संगमेश्वर येथे पूरस्थिती आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील श्रद्धा हॉटेलला पाण्याचा वेढा पडला असून, हॉटेलचं मोठं नुकसान झालंय. शास्त्री नदी आणि असावी नदीही पात्र सोडून वाहत आहेत. संगमेश्वरमधील रामपेठ बाजारपेठेत अनेक दुकानं आणि घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं जनजीवन ठप्प झालं.

करुळ घाटात दरड कोसळली

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या करुळ घाटात दरडी आणि मातीचा मलबा कोसळल्यानं तब्बल 7 तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली. सकाळी 9 च्या सुमारास दरड कोसळली. सुदैवानं त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महामार्ग प्राधिकरणाकडून मलबा हटवण्याचं काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होतं. त्यामुळं ठप्प झालेली वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली.

कणकवली आचरा मार्ग ठप्प

कणकवली आचरा राज्य मार्गावरही पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली. जानवली-वरवंडे संगम नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं 15 ते 20 गावांचा संपर्क तुटलाय… सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप होत आहे.

कोकणात ऑरेंज अलर्ट

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. समुद्रात ३ मीटर उंचीच्या लाटा उसळत असल्यानं मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलंय. एकंदरीत, कोकणात पावसानं हाहाकार माजवला असून, प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत


About Author

Smita Gangurde

Other Latest News