मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. रायगडावरील शिव पुण्यतिथी कार्यक्रमासाठी ते महाराष्ट्र दौऱ्याला आले आहेत. दरम्यान, या दौऱ्यात शनिवारी रायगडावरचा कार्यक्रम झाला. यानंतर त्यांनी मुंबईत सायंकाळी भाजपाच्या नेत्यांची बैठक घेतली. आज ते दुपारी भोपाळला रवाना होणार आहेत. पण त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सह्याद्री अतिगृह येथे भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला असून, या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड कोणती चर्चा झाली? यावर विविध तर्कवितर्क काढले जाताहेत.
शिंदे नाराज असल्याची चर्चा…
दरम्यान, शनिवारी शिव पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अन्य नेते उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या नियोजनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणासाठी नाव नव्हते. परंतु देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंनी भाषण करावं, असा आग्रह धरला. एकनाथ शिंदे यांची नाराज असल्याची चर्चा होती आणि ते नाराज होऊ नये यासाठी त्यांना भाषणाची संधी दिल्याचे बोलले जात आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे भरत गोगावले दोन्हीकडून पालकमंत्री पदावर दावा करण्यात येतोय. त्यामुळे महायुतीत पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. तसेच निधी आणि शिवसेनेच्या आमदार, मंत्र्यांच्या कामाबाबतही शिंदेंनी अमित शहाकडे अजित पवारांची तक्रार केल्याचे हे बोलले जात आहे.

एकनाथ शिंदे यांची तक्रार काय?
- महायुतीत निधीचे समान वाटप होत नाही
- आमच्या पक्षालाही निधी देण्यात यावा
- शिवसेनेच्या मंत्र्यांच्या फायली यांना मंजुरी देण्यात येत नाही
- शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांना निधीत समान वाटपाचा हक्क मिळाला पाहिजे
- अशा तक्रारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे केल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अजित पवार यांना विचारले असता, एकनाथ शिंदे आणि आमचे महायुतीत चांगले संबंध आहेत आणि एकनाथ शिंदे अशी कोणती तक्रार करणार नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. परंतु आता एकनाथ शिंदेंनी अमित शहांची घेतलेली भेट आणि बंद दाराआड झालेली दोन नेत्यांमध्ये चर्चा यावरून तर कवितर्क काढले जात आहेत.