Congress supports Bachchu Kadu – सध्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांचे गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. बच्चू कडू यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे वास्तववादी आहेत. शेतमालाला भाव नाही, शेतकरी आज मोठ्या संकटात आहे, सत्ताधा-यांनी निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही.
बळीराजा हताश आणि निराश…
दरम्यान, राज्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्यामुळे अगोदरच संकटात असलेला शेतकरी पूर्णपणे हताश आणि निराश झालेला आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज आहे. बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन करून या प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. काँग्रेस पक्षही सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारत आहे. त्यामुळं बच्चू कडूंचा काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेला आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट केलं आहे.

शेतकरी जगला तर महाराष्ट्र व देश जगेल
जगाचा पोशिंदा बळीराजाच अडचणीत आहे. शेतकरी जगला तर महाराष्ट्र आणि देश जगेल, त्यामुळे शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारविरोधातील संघर्ष चालूच ठेवणार असून आगामी काळात तो आणखी तीव्र करेल. शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी तसेच शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा, या मागण्यासांठी राज्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेस पक्षाकडून आंदोलने सुरु आहेत.