ठरलं! ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळाले, ‘या’ खात्याची जबाबदारी स्वीकारणार

Chhagan Bhujbal Portfolio : अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना पुन्हा अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी मिळाली आहे. पूर्वी हा विभाग धनंजय मुंडे यांच्याकडे होता. आता यासंदर्भात सरकारी आदेश जारी करण्यात आला आहे आणि छगन भुजबळ यांना औपचारिकपणे या विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी (२० मे) राजभवन येथे मंत्रिपदाची शपथ घेतली होती. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिली. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर निर्माण झालेल्या रिक्त जागेवर भुजबळ यांचा समावेश करण्यात आला आहे.

सरकार स्थापनेवेळी मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले नव्हते

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असूनही, छगन भुजबळ यांना यापूर्वी महायुती सरकारमध्ये स्थान मिळाले नव्हते, त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होत्या. मंत्रीपद न मिळाल्याबद्दल त्यांनी अनेक वेळा नाराजी व्यक्त केली होती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट टीकाही केली होती. अजित पवार यांनी मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला होता.

मागील सरकारमध्येही भुजबळांकडे हेच खाते होते

मागील सरकारमध्ये भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय होते, जे नंतर सध्याच्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले. मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर काही काळ हे खाते अजित पवारांकडे राहिले, परंतु आता ते पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

छगन भुजबळ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार

मंत्रीपद मिळाल्यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, “यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती मला नुकतीच मिळाली आहे. मी आता मुंबईला जात आहे आणि ताबडतोब विभागाचा कार्यभार स्वीकारणार आहे. मी आमचे मुख्य अधिकारी, सचिव इत्यादींसोबत बैठक घेईन आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याचा आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करेन.”

हा माझाच विभाग होता – भुजबळ

छगन भुजबळ पुढे म्हणाले, की “पूर्वी हा माझाच विभाग होता. कोरोना काळात,  जेव्हा सर्वजण घरी होते, तेव्हाही आम्ही प्रत्येक गावातील प्रत्येक रेशन दुकानात धान्य पोहोचवले, कोणाकडूनही तक्रार आली नाही. आमच्या विभागाने दिवसरात्र मेहनत घेतली. आताही आमचे उद्दिष्ट एकच आहे. कोणताही घोटाळा होऊ नये, सर्व गरिबांना चांगल्या दर्जाचे अन्नधान्य मिळाले पाहिजे. राज्यात जिथे जिथे भटक्या किंवा मागासवर्गीय लोक असतील तिथे त्यांना तात्काळ रेशन कार्ड आणि अन्नधान्य दिले जाईल.

शिवभोजन थाळीवर छगन भुजबळ काय म्हणाले?

भुजबळ म्हणाले, “शिवभोजनाबद्दल काही तक्रार असल्यास ती देखील सोडवली जाईल.” हा विभाग आधीही माझा होता. मला मंत्रीपद न मिळाल्याने ते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले. आता मुंडेंना दूर जावे लागले आणि मला पुन्हा हे खाते मिळाले आहे.”


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News