अनेक लोक असे असतात जे आपल्या सोबत लहानपणीच्या आठवणी जपून ठेवतात, तर काही लोक असेही असतात जे त्या आठवणी काही दिवसांत किंवा काही वर्षांत विसरून जातात. मात्र असे मानले जाते की मनुष्य सहसा ४ वर्षांच्या आधीच्या सगळ्या गोष्टी विसरतो. त्या काळात त्याने काय केलं, कुठे खेळला–धावला, हे सर्व विसरून जातो. पण असं काय होतं की माणूस ४ वर्षांपूर्वीच्या गोष्टी का विसरतो? चला, आपण यामागचं कारण सविस्तर जाणून घेऊया.
असं का होतं?
लहानपणी, विशेषतः ४ वर्षांपर्यंत वय असताना, आपल्या मेंदूमधील हिप्पोकॅम्पस पूर्णपणे विकसित झालेला नसतो. हिप्पोकॅम्पस हे आपल्या आठवणी साठवण्यात महत्त्वाचं काम करतं. त्यामुळे ४ वर्षांपूर्वी आपण जे काही पाहतो, करतो किंवा अनुभवतो, त्या गोष्टी स्मृतीत साठवता येत नाहीत आणि आपल्याला त्या गोष्टी आठवत नाहीत.

त्याशिवाय, भाषा हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो, आणि ती ३ ते ४ वर्षांच्या मुलांमध्ये पूर्ण विकसित झालेली नसते. त्यामुळे ते आपले अनुभव शब्दांत व्यक्त करू शकत नाहीत, म्हणून त्या आठवणी टिकत नाहीत.
त्यावेळी मेंदू अतिशय वेगाने विकसित होत असतो, नवीन न्यूरल कनेक्शन सतत तयार होत असतात आणि काही नष्ट होत असतात. त्यामुळे आठवणी सुद्धा तयार होतात आणि नष्ट होतात. एका संशोधनानुसार, बहुतांश लोकांना ३.५ वर्षे वयाच्या आधीची कोणतीही गोष्ट स्पष्टपणे आठवत नाही.
मुलांवर करण्यात आलेलं संशोधन
या संदर्भात येल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एक अभ्यास केला होता, ज्यामध्ये ४ वर्षांखालील मुलांना एक विशिष्ट छायाचित्र दाखवण्यात आलं. त्यानंतर पाहिलं गेलं की, त्या छायाचित्राबद्दल त्यांना काही आठवतं का. अभ्यासात असं लक्षात आलं की, पहिल्यांदा छायाचित्र पाहिल्यावर त्यांच्या मेंदूतील हिप्पोकॅम्पस अधिक सक्रिय झाला. जेव्हा त्यांना तीच छायाचित्र परत दाखवण्यात आली, तेव्हा त्यांनी ते ओळखलं.
यावरून हे सिद्ध झालं की, लहान मुलांमध्येही मोठ्यांसारख्या आठवणी साठवण्याची क्षमता असते. पण त्यांचं लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी असते, त्यामुळे आठवणी दीर्घकाळ टिकत नाहीत.