Samruddhi Highway – सामान्य लोकांसाठी एक अतिशय महत्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही मुंबई नाशिक प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आता मुंबई-नाशिक अंतर फक्त अडीच तासात गाठता येणार आहे. समृद्धी महामार्गाचा अखएरचा टप्पा आज ( गुरुवारी, 5 जून) रोजी खुला होणार आहे. इगतपुरी ते ठाण्यातील आमणे अशा 76 किलोमीटरच्या मार्गाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री इगतपुरीतून तर उपमुख्यमंत्री शिंदे ठाण्यातील आमणेतून या मार्गाचं एकाचवेळी लोकार्पण करणार आहेत.
मुंबई-नाशिक फक्त अडीच तासांवर
दरम्यान, अखेरच्या टप्प्यात 7.74 किलोमीटरचा समृद्धीवरील सर्वात मोठा बोगदाही असेल. हा मार्ग सहा लेन असेल. एकूण 701 किलोमीटर मार्गाचा मुंबई ते नागपूर असा समृद्धी महामार्ग आहे. मुंबई ते नाशिक अंतर गाठण्यासाठी पावणेचार तास लागत होते. मात्र समृद्धीने प्रवास केल्यानंतर प्रवाशांचा सुमारे सव्वा तास वाचणार असून, आता हेच अंतर केवळ अडीच तासांवर आले आहे. तर दुसरीकडे आता समृद्धी महामार्गावरुन मुंबई ते नागपूर हे अंतर आठ तासांत पूर्ण करता येणार आहे.

सर्वाधिक लांबी रुंदीचा बोगदा
या टप्प्यामध्ये एकूण 5 दुहेरी बोगदे असून या बोगद्यांची लांबी 10.73 कि.मी (दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी 21.46 कि.मी) आहे. त्यातील पॅकेज 14 (इगतपुरी) येथील बोगदा 8.00 कि.मी लांबीचा असून हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबी व रुंदीचा (17.61 मीटर) बोगदा आहे. या बोगद्याची उंची 9.12 मीटर आहे. समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्यातील 76 कि.मी. ची लांबी ही नाशिक व ठाणे या दोन जिल्ह्यात येते. सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अभियांत्रिकी आव्हान पेलले.
काय आहेत वैशिष्टये?
- प्रथमच बोगद्यात वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा
- सर्वाधिक लांबीचा पूल
- इंटरचेंजेस
- पर्यावरण पूरक
- प्रवासातील सुलभता
- सर्वाधिक लांबी रुंदीचा बोगदा