मुंबई- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का, अशा चर्चा सुरु आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्यानं एकत्र येण्याचं आवाहन करण्यात येत असलं तरी राज ठाकरे आणि मनसे मात्र याबाबत सावध भूमिकेत दिसते आहेत. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आल्यानंतर, युतीच्या चर्चांना पुन्हा जोर आला. त्यातच उद्धव ठाकरे यांनीही याबाबत जाहीर भाष्य करत महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल, असं सांगत ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचे संकेत दिले आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेच्या मुंबईच्या पदाधिकारी सुजाता शिंगाडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांंनी मनसेसोबत युतीवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल. याबाबतचे जे बारकावे आहेत ते आम्ही पाहतो आहोत. याबाबत काही संदेश देणार नाही तर थेट बातमी देईन. आपल्या आणि शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. मनसैनिकही एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याही मनात कोणताही संभ्रम नाही. असं सांगत ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

उद्धव ठाकरेंच्या मनात काय, मनसेचा सवाल
2014, 2017 साली दोन्ही भावांनी एकत्र यावं ही महाराष्ट्राची इच्छा होती, मात्र त्यावेळी उद्धव ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतला. 2019 साली विधानसभा निवडणुकांनंतर भाजपासोबत सत्ता स्थापण्याऐवजी उद्धव ठाकरेंनी वेगळा निर्णय घएतला. त्यामुळं आताही उद्धव यांच्या मनात काय आहे, असा सवाल केला आहे. त्यासोबतच राज आणि उद्धव ठाकरे हेच युतीबाबत अंतिम निर्णय घेतील, असं मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
दोघं भाऊ बोललेही असतील- राऊत
युतीबाबत ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आतापर्यंत दोन्ही भावांचे फोन झालेही असतील, असं विधान संजय राऊत यांनी केलंय. अमित ठाकरे यांनी दोन्ही भावांनी एकमेकांशी संवाद साधायला हवा, असं विधान केलं होतं. त्यावर राऊत यांनी बोलणं झालं असेल असे संकेत दिले आहेत.
महायुतीवर परिणाम होणार नाही
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास त्याचा परिणाम महायुती किंवा भाजपावर होणार नाही, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. हा निर्णय त्या दोघांनी घ्यायचाय असंही ते म्हणालेत. तर दोन्ही ठाकरेंकडून याबाबत कंड्या पिकवण्यात येतायेत. दोघं भाऊ एकत्र येऊ शकणार नाहीत अशी स्थिती असल्याचं शिंदे शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने म्हणाले आहेत. महिनाभरात ही चर्चा टाय टाय फिश झालेली असेल अशीही प्रतिक्रिया तुमानेंनी दिली आहे.