मुंबई: राज्यसरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहिण योजनेमध्ये आता मोठा फेरबदल करण्यात आला आहे. जवळपास 8 लाख लाभार्थी महिलांना 1500 ऐवजी फक्त 500 रूपये हप्ता मिळणार आहे. हा एवढा मोठा बदल नेमका कसा करण्यात आला आहे, त्याबद्दल माहिती घेऊयात
नमो शेतकरी सन्मान निधी घेणाऱ्यांचा लाभ कमी
ज्या महिला आधीपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे एक हजार रूपये मिळवत आहेत. त्यांना या 1500 रूपयांपैकी फक्त 500 रूपये मिळणार आहेत. ही कपात होण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या वाढलेली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून 6,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेतून देखील 6,000 रुपये, अशा एकूण 12,000 रुपयांचा वार्षिक लाभ काही महिलांना मिळतो. त्यामुळे अशा महिलांना दुहेरी लाभ टाळण्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजनेतून मिळणाऱ्या रकमेची कपात करून ती फक्त 500 रुपये करण्यात आली आहे.

एकावेळी एका योजनेचा लाभ
सरकारी नियमानुसार महिलेने एका वेळी एकाच योजनेचा लाभ घ्यावा असे संकेत आहेत. असे असताना पण मागील काही काळात असे दिसून आले की अनेक महिला एकाचवेळी शेतकरी सन्मान निधी आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. याच पार्श्वभूमीवर सरकारने छाननी केली असून, ज्या महिला दोन्ही योजना घेतात त्यांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून केवळ 500 रुपयेच मिळतील, असा निर्णय घेतला आहे.
या नव्या निर्णयामुळे सुमारे 8 लाख लाभार्थी महिलांवर परिणाम होणार आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की, आर्थिक लाभाचा दुहेरी फायदा मिळू नये, यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे यापुढे संबंधित महिलांना केवळ एकाच योजनेचा मुख्य लाभ घेता येणार
महिलांमध्ये नाराजी
परंतु, सरकारने अचानक काढलेल्या या फतव्यामुळे महिलांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे. लाडकी बहिण हा निवडणुकीचा जुमला होता, आता सरकार काटछाट करत आहे अशी टीका विरोधकांकडून केली जाऊ लागली आहे.