हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांनुसार, ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे विश्वाचे निर्माता, रक्षक आणि संहारक मानले जातात. पण हा प्रश्न तुमच्या मनात अनेकदा आला असेल की जगभरात विष्णू आणि महेश (भगवान शिव) यांची अनेक मंदिरे आहेत. आणि लोक त्यांच्या घरातही त्यांची स्थापना करतात आणि त्यांची पूजा करतात. पण ब्रह्मदेवाची कधीच पूजा केली जात नाही. जाणून घेऊया कथा..
ब्रह्मदेवाला देण्यात आला होता शाप
पुराणांनुसार एकदा ब्रह्मदेवानं विश्वाच्या कल्याणासाठी यज्ञ करण्याचं ठरवलं. पुराणानुसार, एकदा ब्रह्माजी हातात कमळाचे फूल घेऊन आपल्या वाहन हंसावर स्वार होऊन अग्नि यज्ञासाठी योग्य जागा शोधत होते. तेवढ्यात एके ठिकाणी त्याच्या हातातून कमळाचे फूल पडले. पृथ्वीवर ज्या ठिकाणी हे कमळ पडलं, तिथे ब्रह्म देवाचं मंदिर स्थापन झालं, आणि हे ठिकाण राजस्थान राज्यातील पुष्कर येथे आहे. पौराणिक कथेनुसार, पुष्कर येथील ज्या जागेवर कमळ पडलं होतं, ती जागा यज्ञासाठी निवडण्यात आली. यानंतर ब्रह्मदेव यज्ञ करण्यासाठी तिथे पोहोचले. यज्ञ एका शुभ मुहूर्तावर सुरू होणार होता, परंतु बह्मदेवाची पत्नी सावित्री वेळेवर पोहोचली नाही. यज्ञाच्या ठिकाणी शुभ मुहूर्ताच्या अगोदर सर्व देव आले, पण देवी सावित्री आली नव्हती. तेव्हा ब्रह्मदेवानं नंदिनी गायीच्या मुखातून गायत्री देवीला प्रकट केलं, आणि तिच्याशी विवाह करून यज्ञ पूर्ण केला.
