इंग्लंड मालिकेपूर्वी टीम इंडियाला तगडा झटका, शमी आणि बुमराह यांच्या फिटनेसने टेन्शन वाढवले

टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

IND vs ENG Test Squad : इंग्लंड दौऱ्यावर भारताचा नवा कसोटी कर्णधार कोण असेल? हे शनिवारी कळेल. कारण या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा शनिवारी होण्याची शक्यता आहे. नवीन कर्णधार म्हणून जसप्रीत बुमराह याचे नाव पुढे येत आहे, पण आता त्याच्या आणि मोहम्मद शमीबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे. टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाज खूप महत्वाचे आहेत, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह दोघेही खूप अनुभवी गोलंदाज आहेत. पण शमी फिटनेसमुळे या दौऱ्यातून बाहेर पडू शकतो. तर बुमराह देखील सर्व ५ सामने खेळणार नाही. गेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान बुमराहला दुखापत झाली होती, त्यानंतर तो थेट आयपीएलमध्ये खेळला, सध्या तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे.

बुमराह आणि शमी यांचे फिटनेस अपडेट

द इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वैद्यकीय पथकाने बोर्डाला कळवले आहे की मोहम्मद शमी बराच काळ गोलंदाजी करू शकणार नाही. त्याच्या सर्व ५ सामने खेळण्याची शक्यताही कमी आहे.

जसप्रीत बुमराहबाबत, असे सांगण्यात आले आहे की त्याने बीसीसीआयला आधीच कळवले आहे की त्याचे शरीर ३ पेक्षा जास्त कसोटी सामने खेळण्यास सक्षम नाही.

अशा स्थितीत, जर बुमराह इंग्लंड दौऱ्यातील सर्व ५ कसोटी सामने खेळला नाही, तर त्याला कर्णधार म्हणून निवडणे कठीण होईल. अशा परिस्थितीत शुभमन गिल या दौऱ्यावर कर्णधार असू शकतो.

बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “मोहम्मद शमी सनरायझर्स हैदराबादसाठी त्याचा पूर्ण स्पेल टाकत आहे पण बोर्ड आणि निवडकर्त्यांना माहित नाही की तो एका दिवसात १० पेक्षा जास्त षटके टाकू शकतो की नाही. इंग्लंडच्या खेळपट्ट्यांना वेगवान गोलंदाजांकडून लांब स्पेलची आवश्यकता असते, त्यामुळे कोणताही धोका पत्करता येणार नाही.”

या हंगामातील मोहम्मद शमीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ९ सामन्यांमध्ये १८० चेंडू टाकले, ३३७ धावा दिल्या आणि फक्त ६ विकेट्स घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट ११ (११.२३) पेक्षा जास्त होता.

शमीने शेवटचा कसोटी सामना जून २०२३ मध्ये खेळला

दुखापतीमुळे शमी बराच काळ संघातून आत-बाहेर होत आहे. त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने जून २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. दुखापतीमुळे तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्येही खेळू शकला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये शमीने ६४ कसोटी सामन्यांच्या १२२ डावात २२९ विकेट्स घेतल्या आहेत.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News