मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याने राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित भागात पावसाने जोर धरला आहे. पुढील पाच दिवस पावसाची हीच स्थिती कायम राहणार असून, त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सून बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्येही दाखल झाला आहे. तसेच उर्वरित अरबी समुद्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल हवामान तयार झाले आहे.
2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
आज (20 जून) आणि उद्या (21 जून) रोजी राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अतिवृष्टी होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एवढा मुसळधार पाऊस पडत असला तरी, म्हणावा तसा गारवा अजून जाणवत नाहीये. पाऊस थांबला की लगेच घामाच्या धारा सुरू होतात.

किनारपट्टी भागात जोरदार पाऊस
उत्तर कोकण ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत द्रोणिका रेषा स्थिर असून त्यामुळे कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, तसेच शेतकऱ्यांनीही हवामानाचा विचार करून शेतीचे नियोजन करावे, असे सांगण्यात आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर नद्या-नाल्यांना पूर आला आहे. आपत्कालीन यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहेत.
पेरणीच्या कामांना वेग
बहुतांश ठिकाणी आता पेरणीच्या कामांना वेग आला आहे. पावसाने चांगली सुरुवात केल्यामुळे, शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी भात, तूर, उडीद यांसारख्या पिकांच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे.