Maharashtra Rain Update : राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) व एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) यांची पथके तैनात करण्यात आली आहेत.
आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग येथे प्रत्येकी एक एनडीआरएफ पथक पोहोचले आहे. तर गडचिरोली व नांदेड येथे प्रत्येकी एक एसडीआरएफ पथक तैनात करण्यात आले आहे.

९३ लाख नागरिकांना सतर्कतेचा एसएमएस
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेद्वारे “सचेत” ॲपमार्फत आज दिनांक २८ मे २०२५ रोजी एकूण १७ अलर्ट पाठविण्यात आले. हे अलर्ट ९३ लाख ३३ हजार नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले असून, त्यांना संभाव्य आपत्तीविषयी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अहिल्यानगरमध्ये ३९ नागरिकांचा यशस्वी बचाव
अहिल्यानगर तालुक्यातील अकोळणेर, खडकी, वाळकी, सोनेवाडी रोड आणि शिरढोण भागांत अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. याठिकाणी अडकलेल्या ३९ नागरिकांना लष्कर, अग्निशमन दल व पालिका प्रशासनाच्या पथकांनी सुरक्षित स्थळी हलवले.
हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान खात्याने पुढील २४ तासांसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
सर्वाधिक पावसाची नोंद बुलढाण्यात
गेल्या २४ तासांत राज्यातील खालील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे:
बुलढाणा: ४७.९ मिमी
अकोला: ४६ मिमी
जालना: ४४.६ मिमी
यवतमाळ: ३९.७ मिमी
रत्नागिरी: ३५.७ मिमी
१४ जणांचा मृत्यू, १६ जखमी
२७ ते २८ मे २०२५ (दुपारी ४ पर्यंत) दरम्यान राज्यात विविध घटनांमुळे १४ व्यक्ती आणि २० प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमध्ये भिंत कोसळणे, झाड पडणे, वीज कोसळणे, पाण्यात बुडणे, आग लागणे आणि पूराच्या पाण्यात अडकल्याने मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय १६ व्यक्ती व १ प्राणी जखमी झाले आहेत.