Devendra Fadnavis – छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाण्याबाबत एक महत्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. शहराचा पुरवठा योजना सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण करा, तसेच योजना 100 टक्के पूर्ण झाल्यानंतरच समाधान होणार आहे. काम वेळेत होण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा योजनेची आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा…
ठेकेदारांना काम करताना येणाऱ्या अडचणी महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून सोडवाव्यात आणि ठेकेदारांनीही कामे वेळेत पूर्ण करावीत, आवश्यक यंत्र सामग्री आणि मनुष्यबळाचे तसेच सर्व प्रलंबित कामे तातडीने मार्गी लागण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच पाणी पुरवठ्यासाठी जॅकवेल महत्वाचे असून त्याचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून पाणी उपसा सुरू कराव्यात. या योजनेतील २६ एम एल डी पाणी पुरवठा करणारा टप्पा जून अखेरपर्यंत पूर्ण करावा. असंही मुख्यमंत्री म्हणाले.

तातडीने निधीस मंजुरी द्यावी…
दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अपूर्ण असलेले काम लवकर होण्याच्या दृष्टीने पूर्व अभियांत्रिकी पद्धतीने काम करण्यास ठेकेदारास तातडीने मान्यता द्यावी. ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत या पाणी टाक्यांची कामे पूर्ण करावीत. यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महानगरपालिकांनी समन्वयाने काम करावे. कामामध्ये खंड पडू नये यासाठी महानगरपालिकेला ८२२ कोटी रुपयांचा कर्ज निधी उभारण्याची मंजुरी तातडीने द्यावी. आरओडब्लूचे काम एक आठवड्यात मार्गी लावावे, ठेकेदाराने किमान 35 ईएसआर आणि जीएसआर पूर्ण करून द्याव्यात, असं मुख्यमंत्री म्हणाले.