मुंबई : धरणातील पाणी कमी होत असताना टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबई वाॅटर असोसिएशन गुरुवारपासून बेमूदत संपावर गेली आहे. त्यामुळे काही भागात पाणीबाणीची स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. हा संप किती काळ चालणार याची भीती मुंबईकरांना असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘अॅक्शन मोड’वर आले आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी थेट मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना या प्रश्नी मध्यस्थी करण्यास सांगितले आहे. याविषयी त्यांनी आपल्या ट्विटरवरून माहिती दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की मुंबईतील टँकरचालकांचा संप सुरु असल्याने काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळ्याचा काळ पाहता ही स्थिती अशीच राहणे योग्य नाही. त्यामुळे बदललेले नियम आणि टँकरचालकांच्या मागण्या यातून सुवर्णमध्य साधत, सामान्य जनतेला त्रास होणार नाही, यादृष्टीने तातडीने तोडगा काढावा, असे निर्देश मी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
टँकरचालक संपावर का?
मुंबई महापालिकेने केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे नियम अधिक कठोर केले आहेत. त्यामध्ये ज्या जलसाठ्यातून विहीरीतून पाणी टँकरचालकांना घेत आहेत. त्या विहीर मालकांची परवानगी बंधनकारण करण्यात आली आहे. तसेच इतर नियम लावण्यात आले असून परवाने घेणे बंधनकारक करण्यात आले आहेत. टँकरचालकांच म्हणणे आहे की नियमांच्या नावाखाली त्यांची अडवणूक होत आहे.
कुठे कुठे परिणाम
तब्बल 1800 टँकर्स चालकांकडून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. प्रामुख्याने मोठी गृह संकुले, हाॅटेल्स , बांधकाम यांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेली दोन दिवस टँकरचालक संपावर असल्याने गैरसोय होत आहे. टँकरचालकांचे म्हणणे आहे की, पालिका अधिकारी आणि स्थानिक पोलिसांकडून त्यांना नियमांच्या नावाखाली त्रास दिला जातोय.