भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे नाव बदलले, सचिनसोबत या दिग्गजाच्या नावाने सामने रंगणार

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 5 वेळा पटौदी ट्रॉफी खेळवली गेली आहे. यामध्ये भारताला केवळ एकदाच विजयी होता आले, इंग्लंडने 3 वेळा ही ट्रॉफी जिंकली असून एक मालिका बरोबरीत सुटली होती.

Tendulkar Anderson Trophy : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. या मालिकेचे रुपडे आता पालटणार आहे. कारण पटौदी ट्रॉफीचे नाव बदलले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता पटौदी ट्रॉफीला ‘तेंडुलकर-आँडरसन ट्रॉफी’ या नावाने ओळखले जाणार आहे. सचिन तेंडुलकर आणि जेम्स आँडरसन हे आपल्या-आपल्या देशातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंमध्ये गणले जातात.

पटौदी ट्रॉफीची सुरुवात 2007 साली भारत-इंग्लंड कसोटी सामन्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आली होती. त्यानंतर भारत आणि इंग्लंडमधील द्विपक्षीय कसोटी मालिका पटौदी ट्रॉफी या नावाने ओळखली जात होती. ही ट्रॉफी पटौदी घराण्याच्या नावाने होती, ज्यांनी भारताला इफ्तिखार अली खान पटौदी आणि मंसूर अली खान पटौदी अशा दोन कर्णधार दिले होते.

कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होणार

भारत-इंग्लंड कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. यावेळी ही मालिका तेंडुलकर-आँडरसन ट्रॉफी या नावाने ओळखली जाईल. सचिन तेंडुलकरने आपल्या ऐतिहासिक कसोटी कारकिर्दीत 15,921 धावा केल्या आहेत. तर जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज म्हणून नाव कमावले आहे. त्याने इंग्लंडकडून 704 विकेट घेतल्या आहेत.

मागील वर्षी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर जेम्स आँडरसन इंग्लंड संघाच्या गोलंदाजी सल्लागाराच्या भूमिकेत सहभागी झाला आहे. याशिवाय तो लंकाशायरकडून काउंटी क्रिकेटही खेळताना दिसतो. विशेष म्हणजे, सचिन तेंडुलकर आणि जेम्स आँडरसन 14 कसोटी सामन्यांमध्ये आमनेसामने आले होते, आणि आँडरसनने सचिनला एकूण 9 वेळा बाद केले होते.

आतापर्यंत एकूण 5 वेळा पटौदी ट्रॉफी खेळवली गेली

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 5 वेळा पटौदी ट्रॉफी खेळवली गेली आहे. यामध्ये भारताला केवळ एकदाच विजयी होता आले, इंग्लंडने 3 वेळा ही ट्रॉफी जिंकली असून एक मालिका बरोबरीत सुटली होती. शेवटची पटौदी ट्रॉफी 2021-22 मध्ये झाली होती, ती 2-2 अशी ड्रॉ झाली होती.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News