राज्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पावसाचा दणका; सातारा, नाशिकला अलर्ट!

राज्यात आता पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. सातारा, नाशिकमध्ये पावसाने हजेरी लावली होती, राज्यातील बहुतांश भागात आता पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

राज्याच्या बहुतांश भागात सध्या पाऊस बरसताना दिसत आहे. उष्णतेपासून राज्यात सर्वदूर काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात नाशिक आणि सातारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सातारा आणि नाशिक जिल्ह्यात गारपिटीचीही शक्यता आहे. राज्यात दिवसभरात कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ते जाणून घेऊयात.

पूर्वमोसमी पावसाला सुरूवात

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पाऊस सुरु झाला आहे. राज्यात 15 मे रोजी नाशिक आणि सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि सातारा जिल्ह्यामध्ये गारपिटीचीही शक्यता आहे. याशिवाय अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सध्या कोकण किनारपट्टी आणि आजुबाजूच्या परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत. पश्चिम बंगालपासून विदर्भ, तेलंगणा ते रायलसीमापर्यंत आणि विदर्भ, मराठवाड्यापासून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगडमध्ये पावसाची नोंद झाली. याशिवाय नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, धाराशिव आणि विदर्भात नागपूरमध्येही पावसाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाचा पावसाचा इशारा

नाशिक आणि सातारा जिल्ह्यामध्ये गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यातही पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे.

पावसामुळे फळ बागांचं नुकसान

या पावसामुळे फळ बागायतदारांना राज्यभरात मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. आंबा, द्राक्ष, केळी बागायतदारांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. लाखो रूपयांच्या नुकसानीमुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत. आणखी पाऊस कोसळल्यास नुकसानीत भर पडणार आहे. याबाबत महसूल विभागाकडून मदतीसाठी अद्याप कुठलीही ठोस पाऊले उचलली गेली नाहीत. त्यामुळे महसूल विभागाने पंचनामे करावेत, आणि शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई वितरीत व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.

उष्णतेपासून मोठा दिलासा

एप्रिल महिन्यात राज्यातील तापमान प्रचंड वाढले होते. मात्र 45 अंशांपर्यंत पोहोचलेले तापमान आता 40 अंशांवर आले आहे. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये तापमान 40 अंशापेक्षा जास्त होते. तर धुळे, सोलापूर, गोंदिया, भंडारा आणि नागपूरमध्ये 39 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. गडचिरोली आणि यवतमाळमध्ये 38 अंशांपेक्षा जास्त तापमान आहे. त्यामुळे पडणाऱ्या पावसामुळे जनतेला उष्णतेपासून चांगलाच दिलासा मिळाला आहे. ही स्थिती पुढील काळात अशीच कायम राहिल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

About Author

Rohit Shinde

Other Latest News