मे महिन्यात राज्यात पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावल्याचे चित्र आहे. सर्वदूर अवकाळी पाऊस आणि गारपीट पाहायला मिळते. आता हवामान विभागाने आजपासून पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात अनेक ठिकाणी 13 मे रोजी म्हणजेच आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय काही जिल्ह्यांना यलो अलर्टही देण्यात आला आहे. सोमवारी राज्यातील बहुतांश भागांमध्ये हलका पाऊस झाला. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील तीन – चार दिवस पावसाचे सावट राहणार आहे. राज्यातील पावसाची स्थिती नेमकी कशी राहणार ते समजून घेऊ…
पश्चिम महाराष्ट्र, कोकणाला ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सातत्याने पाऊस कोसळत आहे. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगरला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काही भागात यलो अलर्ट
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. लातूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांमध्येही विजांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिकला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात सातत्याने पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
राज्यात मान्सून कधी येणार?
देशात यंदा मान्सूनचं आगमन नेहमीपेक्षा आधी होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अंदमान -निकोबार बेटांवर मान्सून दाखल झाला आहे. आणखी 5 दिवसांनी मान्सून दक्षिण अरबी समुद्र, कोमोरिन आणि मालदीवमध्ये पोहोचणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यानंतर 23 ते 25 मे या काळात मान्सून केरळमध्ये दाखल होईल. यंदा महाराष्ट्रात मान्सून नेहमीपेक्षा अगोदर म्हणजे 6 जूनच्या दरम्यान दाखल होण्याचा अंदाज आहे.