Pankaja Munde : गुरुवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम राबविण्यात आले. एकल वापरातील प्लास्टिक हा असूर असून, त्याला पूर्णतः नष्ट करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माध्यमातून कार्य करत आहोत. या कामात जनतेचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची सुरुवात स्वतःपासून करावी, असे आवाहन पर्यावरणीय व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
प्लास्टिक वापरावर बंदीसाठी अभियान…
दरम्यान, एकल वापर प्लास्टिक मुक्त परिसराच्या अभियानाची सुरुवात मंत्रालयापासून केली. बदलती जीवनशैली व वातावरणातील बदलांमुळे कर्करोगासारखे आजार आज मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. त्याचबरोबर तंत्रज्ञान वाढले तसे त्याचे दुष्परिणामही दिसून येत आहेत. गेल्या काही काळापासून होत असलेले वातावरणातील बदल हे गंभीर व अंतर्मुख करणारे आहे. त्यामुळे एकल वापर प्लास्टिक वापरावर बंदीसाठी अभियान सुरू केले आहे. अशा अभियानात लोकसहभाग असेल तर हे उपक्रम यशस्वी होतात. असं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.

प्लास्टिक बंदसाठी मी प्रयत्न करणार…
पुढील पाच वर्षात एकल वापराचे प्लास्टिक पूर्णतः बंद करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर अशी उत्पादने तयार करणाऱ्यांविरुद्ध पोलीस कारवाईसाठी प्रयत्न करणार आहे. या सर्वांपासून पर्यावरण वाचविण्याची सुरूवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी. आजच्या पिढीने प्लास्टिक बाटल्या न वापरणे, एकल वापराच्या प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या वापरणे अशी पाऊले उचलली तर पुढच्या पिढीसाठी चांगले जीवन मिळेल. नागरिकांनीच स्वयंस्फूर्तीने एकल प्लास्टिक वापरणे बंद केले तरच अशी उत्पादने तयार करणे आपोआप बंद होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.