तिरंगा फडकावत पंतप्रधान मोदींनी केलं चिनाब आर्च ब्रिजचं उद्घाटन

पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरचा दौरा केला. या दौऱ्यात जगातील सर्वात मोठ्या रेल्वे ब्रिजचं उद्घाटन करुन विकासपर्व कायम असल्याचा संदेश त्यांनी दिलाय.

श्रीनगर – पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवरील जगातील सर्वात मोठ्या रेल्वे पुलाचं उद्घाटन केलं. या रेल्वे ब्रिजवर तिरंगा फडकावत पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. त्यानंतर मोदींनी अंजी ब्रिज आणि कटरात काश्मीर जाणाऱ्या पहिल्या कटरा-श्रीनगर वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडाही दाखवला

कटरातील भाषणात पाकिस्तानवर टीकास्त्र

मोदी यांनी कटरात सुमारे 40 मिनिटं भाषण केलं. यात त्यांनी दहशतवाद, पाकिस्तान आणि काश्मीरच्या पर्यटनाच्या विषयावर भाष्य केलं. दुर्दैवानं आपल्या शेजारचं राष्ट्र हे मानवतेच्या विरोधात असल्याची टीका त्यांनी केली. गरीबाच्या नोकरी आणि भाकरीलाही हा देश विरोध करत असल्याची टीका त्यांनी केली. पाकिस्ताननं पहलगामचा हल्ला घडवून आणत मानवता आणि काश्मिरियतवर हल्ला केल्याचं मोदी म्हणाले. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर जबर हल्ला केल्याचंही ते भाषणात म्हणाले.

चिनाब आर्च ब्रिज कसा आहे?

जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज अशी चिनाब आर्च ब्रिजची ओळख आहे. रियासी जिल्ह्यात बक्कल आणि कौडी या दोन भूभागांच्यामध्ये हा ब्रिज बांधण्यात आलाय. 2003 साली या ब्रिजला मंजुरी मिळाली होती, 2009 सालापर्यंत हा ब्रिज बांधलं जाणं अपेक्षित होतं. मात्र हा ब्रिज तयार होण्यासाठी 22 वर्षांचा कालावधी लागला.

देशातील पहिल्या केबल स्टे अंजी ब्रिजचंही उद्घाटन

अंजी दरीवर निर्माण करण्यात आलेल्या देशातील पहिल्या केबल स्टे रेल्वे ब्रिजचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते करण्यात आलं. नदी पातळीपासून हा ब्रिज 331 मीटर उंचीवर निर्माण करण्यात आलाय. 1086 मीटर उंचीचा एक टॉवर या पुलाला आधार देण्यासाठी बांधण्यात आलाय. हा टॉवर 77 मजली इमातरीइतका उंच आहे.

अंजी नदीवर या पुलाची निर्मिती करण्यात आली असून, चिनाब ब्रिजपासून याचं अंतर 7 किलोमीटर आहे. हा ब्रिज कटरा आणि बनिहाल या भागांना जोडतो.


About Author

Smita Gangurde

Other Latest News